Wednesday, November 24, 2010

‘व्हॉईस ऑफ होप’

चौदा वर्षांचा वनवास फक्त भारतवर्षात आणि रामायणाच्या काळातच रामाला घडतो असे नाही. अगदी आपल्या शेजारी, आजच्या आधुनिक युगातही गेल्या २० वर्षांपैकी १४ वर्षे स्थानबध्दतेत, विजनवासात, एकांतवासात काढावी लागतात. हा वनवास घडविणारे असतात लष्करी अधिकारी आणि वनवास भोगणारा राम नसतो तर तो भोगणारी असते कमालीची लोकप्रिय, देश पेटविण्याची क्षमता असलेली, लोकशाहीचा आग्रह धरणारी, राजकीय नेतृत्व करणारी एक स्त्री –ब्रम्हदेशमधील (म्यानामार/बर्मा) ऑंग सॅन सू ची. फरक फक्त इतकाच की तिचा हा वनवास केवळ १४ वर्षांचाच असेल अशी खात्री नाही. तो अजूनतरी संपलेला नाही आणि किती काळ चालू राहील ते कोणालाच माहीत नाही.

१९८९ साली सर्वप्रथम म्यानमारमधील लष्करी राजवटीने दॉ सूची (दॉ म्हणजे ऑंटी, काकू – याच नावाने ती म्यानमारमध्ये परीचित आहे) रवानगी स्थानबध्दतेत केली. तिच्याच घरात तिला कैद करण्यात आले. तेव्हापासून सातत्याने ती मधेच आत तर मधेच स्वतंत्र अश्या अवस्थेत आहे, पण त्यातही आतच जास्त. गेल्या २० वर्षांपैकी १४ वर्षे ती तिच्या घरात अटकेत आहे. तिचा गुन्हा एकच आहे. आपल्या देशाची लष्करशाहीच्या विळख्यातून सुटका व्हावी, देशात लोकशाही नांदावी असे तिला मनापासून वाटते आणि से मानणा-या प्रचंड लोकांचा तिला पाठींबा आहे. लष्करशाहीतील तिच्या विरोधकांचा नेमका त्यालाच विरोध आहे आणि म्हणूनच असा लोकशाहीचा विचार मांडणारी व त्याकरता लोकप्रिय असलेली दॉ सू त्यांना खूप धोकादायक वाटते.

पण इतकी वर्षे स्थानबध्दतेत घालवूनही आणि किती घालवावी लागतील याची अनिश्चितता असतानाही तिच्या विचारात काहीच बदल झाला नाही. तिचा लोकशाहीचा आग्रह कायम आहे. त्याला तिचाही नाईलाज आहे कारण स्वांतंत्र्याचे बाळकडूच घेत ती मोठी झाली आहे. तिचे वडील हे खरतर स्वतः एक लष्करी अधिकारी. ब्रम्हदेशचे आधुनिक लष्कर त्यांनी उभे केले. पण त्यांची स्वातंत्र्याची ऊर्मीही तितकीच प्रखर होती. त्यामुळे ब्रिटाशांकडून स्वातंत्र्य मिळवण्यात त्यांचा पुढाकार होता. ते अतिशय लोकप्रिय आणि नव्या स्वतंत्र ब्रम्हदेशचे एक प्रमुख नेते होते. दुर्दैवाने ब्रिटाशांबरोबर स्वातंत्र्याचा करार करून ते परतले आणि पहिल्या निवडणूकांआधीच, नव्याने स्वांतंत्र्य मिळवलेल्या देशाची लोकशाही पध्दतीने नीट घडी बसवण्याच्या आतच १९४८ साली अंतरीम सरकारची बैठक सुरू असतानाच त्या बैठकीतच त्यांची इतर आठ जणांची हत्त्या करण्यात आली. त्या नऊ जणांपैकी सात जण हे ब्रम्हदेशचे महत्वाचे नेते होते. दॉ सू तेव्हा फक्त दोन वर्षांची होती. त्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने ऑँगच्या आईची नेमणूक भारतात राजदूत म्हणून केली. त्यामुळे दॉ सूचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीच्या लेडी श्रीराम महाविद्यालयात झाले. तिचे पुढचे शिक्षण ऑक्सफर्डला झाले. (याच विद्यापीठात पुढे ११९९०मध्ये तिची ऑनररी फेलो म्हणून निवड झाली.) तेथेच तिची भेट मायकेल एरीस या ब्रिटनस्थित तिबेटी स्कॉलरबरोबर झाली. त्यांचे प्रेम जमले आणि १९७२मध्ये तिने त्याच्याशी लग्नही केले. त्यांना दोन मुलेही झाली.

पुढे मायकेलला कॅन्सर झाला. त्याने स्थानबध्द असलेल्या आपल्या पत्नीला भेटण्याकरता बर्मी सरकारकडे वारंवार विनंती केली. पण त्याची विनंती मानली गेली नाही. त्याऐवजी दॉ सूने त्याच्याकडे लंडनला जावे असा सरकारचा आग्रह होता. परंतु आपण एकदा देशाबाहेर गेलो की आपल्याला परत येऊ दिले जाणार नाही ही खात्री असल्याने दॉ सू अश्या परीस्थितीतही देश सोडून गेली नाही. त्या दोघांची भेट १९९५च्या ख्रिसमसमध्ये झाली होती. त्यानंतर साडेतीन वर्षांनी मार्च १९९९मध्ये त्याचेदॉ सूशी भेट न होता निधन झाले.

१९८८मध्ये म्यानम्यारला परतण्याआधी दॉ सूने संयुक्त राष्ट्रसंघ, क्योटो विद्यापीठाचे सेंटर फॉर साऊथइस्ट एशिया स्टडीज, भूतान सरकारचे विदेश मंत्रालय या ठिकाणी काम केले. भारतातही सिमला येथील इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ अडव्हान्स्ड स्टडीज् येथेही ती फेलो होती. आपल्या आजारी आईकडे बघण्यासाठी ती १९८८साली ब-याच वर्षांनंतर आपल्या देशात परतली. त्याचवेळी म्यानमारमध्ये सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या लोकशाहीवादी चळवळीने ती या संघर्षात खेचली गेली. चळवळ करणा-या विद्यार्थ्यांवर जेव्हा लष्करी राजवटीने अन्वनित अत्त्याचार केले आणि शेकडो जखमी विद्यार्थ्यांना जेव्हा रूग्णालयात आणले गेले त्याचवेळी दॉ सू त्याच रूग्णालयात आपल्या आईची सेवा करत होती. रूग्णालयातील भयानक दृश्य पाहून ती विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून गेली ती I could not, as my father's daughter, remain indifferent to all that was going on”या भावनेने.आणि तेव्हापासून ती या चळवळीचा एक महत्वाचा भाग बनली. सुरवातीला विद्यार्थ्यांच्या चळवळीचा परीणाम होऊन जनरल ने विनने बर्मा सोशॅलिस्ट प्रोग्रॅम पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे एकूणच लोकशाहीवादी चळवळीला जोर चढून ती आणखीनच फोफावली. ८-८-८८ अपरायजिंग या नावाने प्रसिध्द असलेली बीएसपीपी सरकारच्या निषेधातील ही चळवळ ८ ऑगस्ट १९८८ साली सुरू झाली आणि देशभर पसरली. त्यात हजारे लोक मारले गेले.

देशातील ही परिस्थिती पाहून दॉ सू हळूहळू या चळवळीची एक प्रमुख कार्यकर्ती झाली. चळवळीचे नेतृत्वच तिच्याकडे आहे. रंगूनमधील प्रसिध्द शेडॉंग पॅगोडासमोर तिने २६ ऑगस्ट १९८८ला जाहीर सभा घेतली आणि लोकशाहीवादी सरकार सत्तेत यावे म्हणून लढा पुकारला. जवळजवळ पाच लाख लोक त्या सभेला हजर होते.तेथपासून ते आजपर्यंत बराच काळ सरकारने तिच्याच घरात तिला कैदी करून आणि लोकांशी तिचा संपर्क येणार नाही याची काळजी घेऊनही जनतेने तिलाच आपले नेतृत्व दिले आहे. परीणामी लष्करी हुकुमशाही राजवटीने प्रयत्न करूनही म्यानमारमधील राजकारण तिच्याभोवतीच फिरत राहीले आहे.

या जाहीर सभेनंतर एक महिन्यातच नॅशनल लीग फॉर डेमॉक्रॅसीची स्थापना करण्यात येऊन दॉ सूची त्याच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. त्यानंतर लगेचच तिच्या आईचे निधन झाले आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत निघालेली तिची अंत्ययात्रा म्हणजे म्यानमारमधील जुलमी, अत्याचारी लष्करी राजवटीचा निषेध करणारी यात्राच ठरली. याचाच अपेक्षितच परीणाम झाला आणि २० जुलै १९८९ला दॉ सूला प्रथमच तिच्याच घरात स्थानबध्दतेत ठेवण्यात आले. ती कैदेत असूनही १९९०च्या निवडणूकीत नॅशनल लीग फॉर डेमॉक्रॅसीने ८२ टक्के जागा जिंकल्या. लष्करशाहीने मात्र या निवडणूकांचे निकाल मानण्यासच नकार दिला. तेव्हापासून म्यानमारमध्ये लष्करी राजवट आणि लोकशाहवादी नागरिक यांच्यात संघर्ष सुरू आहे. मधूनमधून तो उफाळून वर येतो.

अगदी पहिल्या सभेनंतर लगेचच लष्करी राजवटीने दॉ सूचे सामर्थ्य जाणले आणि तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु अगदी शेवटच्या क्षणी एका मेजरने हस्तक्षेप केल्याने तिला मारायला आलेल्या सैनिकांनी तिच्यावर गोळीबार केला नाही व ती वाचली. जीव वाचला तरी आपले स्वांतंत्र्य मात्र तिला गमवावे लागले. एकूणच ब्रम्हदेशातील लोकशाहीवादी चळवळ आणि दॉ सूची मुक्तता हे विषय जागतिक पातळीवर पोचले आहेत. जगभरातील बर्मीज लोक, त्यांचे पाठीराखे आणि एकूणच लोकशाही, मानवाधिकार मानणारे लोक हे सर्वच जण विविध प्रकारे हा विषय जागतिक पातळीवर सतत जागा ठेवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून दॉ सूच्या ६४ व्या वाढदिवशी ६४ फॉर ऑंग सॅन सू ची असे एक संकेतस्थळ सुरू करण्यात आले. तिच्या स्वतंत्र्याकरता जगभरातील लोकांनी संदेश द्यावेत अशी कल्पना यामागे होती व ती कमालीची यशस्वी झाली. हजारो लोकांनी आपले संदेश पाठवले.तिच्या एका चाहत्याने लिहीले होते यू विल नेव्हर वॉक अलोन.

दॉ सूकडे जगाचे लक्ष वळायला मुख्यतः कारणीभूत ठरला तो तिला १९९१मध्ये मिळालेला शांततेचा नोबेल पुरस्कार. कैदेत असताना पुरस्कार मिळालेली ती एकमेव नोबेल पुरस्कार विजेती आहे. नोबेलप्रमाणेच जागतिक पातळीवरील अनेक पुरस्कार तिला लाभले. १९९०मध्ये साखारोव्ह प्राईज फॉर फ्रीडम ऑफ थॉट पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. याखेरीज न्यूहार्थ फ्री स्पिरीट ऑफ द इयर अवॉर्ड २००३, भारत सरकारचे जवाहरलाल नेहरू अवॉर्ड फॉर इंटरनॅशनल अंडरस्टॅंडींग, रॅफ्टो अवॉर्ड हे पुरस्कारही तिला मिळाले, परंतु या सर्वाचा ब्रम्हदेशमधील लष्करी राजवटीवर कोणताही परीणाम झालेला नाही. नोबेल पुरस्कारासोबत मिळालेल्या १.३ दशलक्ष पौंडांचा तिने बर्मीज लोकांना मदत करण्याकरता निधी उभारताच सरकारने परदेशात तिने पैसे खर्च केले म्हणून तिची करविषयक चौकशी करायला सुरूवात केली. अनेक जागतिक संघटना, मोठ्या व महनीय व्यक्ति, अगदीसंयुक्त राष्ट्रसंघ या सगळ्यांनी आवाहन व प्रयत्न करूनही लष्करी राजवटीने तिला आत्तापर्यंत मुक्त केले नव्हते व करतील का याची खात्री नव्हती. क्वचित काही काळ मधेमधे तिच्यावरची काही बंधने थोडीशी हलकी केली गेली आणि परत एकदा काहीतरी कारणाने लादली गेली. म्यानमारमधील निवडणूकांकरता तिला कदाचित यावर्षी तिला मुक्त करतील अशी काहींना आशा होती व त्याप्रमाणे निवडणूकांआधी नाही तरी निवडणूका झाल्यावर तिची मुक्तता करण्यात आली आहे.

मागच्या वर्षी तिच्या स्थानबध्दतेची मुदत संपत आलेली असतानाच अचानक जॉन यट्टॉ हा अमेरीकन युवक तिच्या घराजवळील इन्या तलाव पोहून पार करून तिला भेटायला तिच्या घरी आला. तो पकडला गेला. त्यामुळे परत एकदा तिच्या स्थानबध्दतेत वाढ करण्यात आली. तिच्यापोटी असलेल्या आदरापोटी केवळ आपण तिला भेटायला आल्याचे त्याने म्हटले होते. पण हा सर्वच प्रकार संशयास्पद होता. अनेकांना असा संशय होता की तिच्या स्थानबध्दतेत वाढ करण्याकरता लष्करी राजवटीनेच त्या तरूणाला पाठवले असावे. काहीही असले तरी त्याचा परीणाम मात्र दॉ सूची स्थानबध्दता वाढण्यात झाली हे खरे.

दॉ सू पक्की बुध्दीस्ट आहे. पण तिला परीचित असलेल्या विरोधी विचार आणि अनेकता याबद्दलची सहनशीलता, मानवाधिकारांबद्दलचा आदर आणि नैतिक सभ्यतेवर भर या पाश्चिमात्य परंपरा म्यानमारच्या जीवनात आणून तिने स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूपच बदलले. आपल्या एका कवितेत ती म्हणते

A free bird...

which is just freed

used to be caged

now flying with an olive branch

for the place it loves.

A free bird towards a Free Burma.

Why do I have to fight???

तिच्या कवितेतील पक्षी पिंज-यातून मुक्त झाला आहे, पण तिच्या वाट्याला हे भाग्य अजून आलेले नाही, केव्हा येईल, येईल का नाही माहीत नाही. पण तिचा लढा मात्र अजूनही त्याच जिद्दीने अगदी ६५व्या वर्षीही सुरू आहे. तिच्यात हे बळ कोठून येते याची कल्पना नाही, पण नोबेल पुरस्काराचे एक मानकरी बिशप डेस्मंड टुटु यांनी मात्र तिला नेमके ओळखून, तिचे अचूक वर्णन केले आहे - In physical stature she is petite and elegant, but in moral stature she is a giant. Big men are scared of her. Armed to the teeth and they still run scared.



No comments:

Post a Comment